Wednesday, October 31, 2018

मी "अतिरेकी"

प्रसंग पहिला:
वय वर्षे ८: मी तिसरी चौथीत असेन त्यावेळी. पाचव्या दिवशी घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर अनंतचतुर्दशीपर्यंतच्या कुठल्यातरी एका रविवारी आई बाबा मला आणि माझ्या भावाला सांगलीला फिरायला आणि देखावे बघायला घेऊन जात. सांगलीत पोहोचल्यावर दुपारी चार वाजता बाबा आम्हाला मसाला डोसा खायला घालत आणि त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन नंतर सगळीकडचे देखावे बघायला सुरुवात होई. त्या वर्षी पण देखावे बघायला सुरु  केल्यावर थोड्या वेळांनंतर मला भूक लागली म्हणून बाबांनी एक किलो पापडी मला आणि भावाला खाण्यासाठी घेऊन दिली. एक किलोचा पूडा हातात आल्यावर आम्हा दोघांची अविरत चरंती सुरु झाली. जर आपण फार  हळू हळू खाल्लं तर भावाला जास्त पापडी खायला मिळेल आणि पापडी पण संपेल ह्या भीतीनं मी पण खायचा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात पापडीचा पूडा संपलाही. सगळे देखावे बघून झाल्यावर शेवटच्या बसने आम्ही घरी पोचलो. रात्री मला काही झोप लागेना. शेवटी रात्री दोन च्या सुमारास अंथरुणातच भडाभडा उलटी झाली. त्या दिवसापासून मला खूप आवडणाऱ्या पापडीबद्दल माझ्या मनात इतकी शिसारी निर्माण झाली कि आजतागायत मी पापडी खात नाही. 

प्रसंग दुसरा: 
वय वर्षे १३: मी सहावी सातवीत असतानाची गोष्ट. मे महिन्यात सगळ्यांच्या घरी चैत्रागौरी बसायच्या आणि शेजार पाजारच्या बायका हळदी कुंकवाला बोलवायच्या . गौरीची आरास, डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि कैरीचं पन्ह यासाठी मी पण आई बरोबर सगळीकडं हळदीकुंकवाला जायचे. त्या वर्षी पण घरच्या हळदीकुंकवासाठी बनवलेली कोशिंबीर आणि पन्हे पोटभर हादडल्यावर परत सगळीकडं हळदीकुंकवाला आई बरोबर निघाले. जवळपास सात-आठ घरी बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर आणि पन्हे खाऊन पिऊन  झाल्यावर त्या रात्री पोटात काहीतरी जाम 'केमिकल लोच्या' झाला आणि पोटातल्या कोशिंबीर आणि पन्ह्यानं पोटातून बाहेर येण्यासाठी बंड पुकारलं. त्यांच्या विनंतीला मान  दिल्यांनतरच मला त्या रात्री झोप आली. त्या पुकारलेल्या बंडाचा विरोध म्हणून असेल पण आजही मी डाळीची कोशिंबीर, भिजवलेले काळे हरभरे आणि पन्ह्याला हातही लावत नाही. 


प्रसंग तिसरा: 
वय वर्षे अठ्ठा..... (बायकांनी वय सांगू नये म्हणतात):  तर पनीर हा माझा वीक पॉईंट. जेवायला बाहेर गेलं तर स्टार्टर मध्ये पनीर, मेन कोर्स मध्ये पनीर पराठा, पनीर करी, पनीर बिर्याणी.. असं माझं पनीर प्रेम. तर हा किस्सा तेव्हाचा ज्या वेळी मी बेंगलोरला जॉब करत होते. भारतातल्या फूड, टेक्सटाईल आणि लेदर कंपन्यांची ऑडिट्स आणि इन्स्पेक्शन करण्याचं काम असल्यानं सारखं फिरायला मिळायचं. तर त्या वर्षी तामिळनाडूच्या तिरूपूर या ठिकाणी एका टेक्सटाईल कंपनीमध्ये ३१ डिसेम्बरला सरप्राईस  इन्स्पेक्शन ठरवलं होतं. ३१ ला रात्री जवळपास ११ वाजता माझी परतीची बस होती.तिरूपूर हे टेक्सटाईल हब असल्याने कपडे अगदीच स्वस्त. तर संध्याकाळी काम संपल्यावर कपडे खरेदी करावी आणि तिथूनच बस पकडावी म्हणून मी ६ वाजता काम संपल्यावर खरेदीला निघाले. खरेदी संपल्यावर काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून तिथल्याच एक चांगल्या पंचतारांकित हॉटेलात गेले (पैसे कंपनी देणार होती ना म्हणून). तर ३१ डिसेंबर असल्याने त्यांनी मुख्य रेस्टॉरंट बंद ठेवले होते आणि बाहेर गार्डन मध्ये काही प्रोग्रॅम्स आणि कॉकटेल पार्टी चालली होती. जेवणाची सुरुवातही झालेली नव्हती त्यामुळं मी त्यांना फक्त माझ्यासाठी त्या मेनू मधील कुठलीही एक पनीर ची करी आणि रोटी घेऊन यायला सांगितली. एका मोठया हंडीमध्ये वेटरनं शाही पनीर करी आणली. काजू बदाम यांची ग्रेव्ही आणि वरून केसर, पिस्ता घातलेली पनीर करी आणली आणि नेहमीसारखी मी ती पोट भरून खाल्ली. ताटात काही सोडायचं नाही हे शिकवल्यामुळं आणि अर्थातच पनीर मनापासून आवडत असल्यानं शेवटची अर्धी उरलेली करी पण नुसतीच चमच्याने खाल्ली. नशिबानं त्या रात्री बसमध्ये उलटी झाली नाही पण त्यांनतर पनीर समोर दिसलं कि त्या रात्रीची घटना, त्या थोड्या "जास्तच" शाही असलेल्या पनीरचा वास माझ्या नाकात येतो. पनीर आता मी अजिबात खात नाही. 

----------

"अति तेथे माती" या उक्तीचा आयुष्यात तीन वेळा अनुभव आलेला आहे. लहापणी आज्जी आजोबा, नंतर आई बाबा, नंतर नवरा आणि आता मुलगा पण "थोडं कमी खा", अन्न  काही पळून जात नाही हवं तर थोड्यावेळाने किंवा उद्या उरलेलं खा" असं म्हणत असतात. ह्या आणि ह्यासारख्या अनंत सूचना लहानपणापासून ऐकत आल्यानं आणि खाण्याबाबतीत  मी एवढा अतिरेक करत असल्यानं कुठंतरी माझ्या रक्तात "अतिरेक्या" चा Gene  असल्याची मला खात्री झालेली आहे. त्यावर बऱ्याचदा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न फोल ठरल्याने अजूनही मी भरली वांगी, बासुंदी, भजी , काजू कतली  ह्या आणि ह्यासारख्या अनेक खाद्यपदार्थांचा अत्यंत हिंसात्मक पद्धतीनं खातमा करून त्यांचा फडशा पडत असते. 

दिवाळी आठवड्यावर आलीय. आत्तापर्यंत सगळ्यांच्या घरी फराळाची तयारी सुरु झाली असेल. साखरेचे, डाळीचे आणि इतर रोजच्या वापरातले डबे रिकामे करून त्यांची जागा आता फराळाच्या पदार्थांनी घेतली असेल. दिवाळीच्या चार दिवसांचा मेनू पण ठरवला गेला असेल. ह्या दिवाळीत आपण सर्वांनीही आपल्या "अतिरेकी" पणाला योग्य तो न्याय देऊन दिलखुलास आणि पोटफुलास हाणावे. फक्त ही आणि येणारी प्रत्येक दिवाळीच  नाही तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना जे हवे, जसे हवे, जितके हवे तेवढे मनसोक्त खायला मिळण्याएवढे आरोग्य, समृद्धी आणि संपत्ती लाभो हीच देवाचरणी अपेक्षा. आपणा सर्वाना दिवाळसणाच्या "अतिरेकी" आणि पोट फुटेपर्यंत शुभेच्छा.   



Tuesday, October 30, 2018

सूतक



वासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं  काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता. चित्रा, विमलाबाई आणि वासुदेवरावांची मुलगी; वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकताच स्वतःच्या मुला बाळांना आणि नवऱ्याला घेऊन पहाटेच पुण्याहून निघाली होती आणि नुकतीच घरी पोचली होती. आल्या आल्याचं बायकांनी तिला पण गराडा घातला. 
"आई....हे सगळं असं अचानक? कसं  काय?" चित्राच्या डोळ्यात पाणी तरळले 
"सकाळी उठून चहा घेऊन ह्यांच्या खोलीत गेले तर हे अजून झोपलेले. नेहमी पहाटे चारला उठून अंघोळ करून बैठकीत बसणारा माणूस पण आज काही केल्या उठेना. चार वेळा हाकापण मारून झाल्या. शेवटी अंगाला हात लावून बघितला तर अंग थंड गार पडलेलं." विमलाबाईंनी तेवढ्याच थंड पणाने  उत्तर दिलं . 
"चित्रा, सकाळपासुन विमला वाहिनी रडल्या नाही आहेत बघ. डोळ्यात एक टिपूस पण आलेलं नाही हो." घरा शेजारीच राहणाऱ्या मालतीबाईंनीं चित्राला माहिती पुरविली. 
"आई, अगं  असं का करतेयस? बाबा नाही राहिले गं..." चित्रा विमलाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. 
"हो. माहित आहे मला." असं म्हणून विमलाबाई उठल्या आणि संथपणे वाड्याच्या शेवटी असलेल्या अडगळीच्या खोलीकडं  चालू लागल्या. आत जाऊन त्यांनी दरवाजा लोटून घेतला. 
____________________________________________

वयाच्या सतराव्या वर्षी लग्न करून जेव्हा विमला पहिल्यांदा या वाड्यात आली तेव्हा एवढा मोठा वाडा बघून आधी बावरली. विमलाचे वडील श्री जनार्दन कुळकर्णी हे साताऱ्याचे प्रसिद्ध भटजी. घरात नेहमी सोवळ्यात स्वयंपाक चालायचा. विमला वडिलांच्या बरोबर लहानपणापासून पूजेला जाई. पूजेची तयारी करणे, वडिलांच्या पाठोपाठ मंत्रपठण करणे, स्वयंपाकघरात नैवेद्याला मदत करणे, नैवेद्याचं ताट सजवणे याची तिला अतिशय आवड. दर संध्याकाळी वडिलांचं  बोट पकडून मुरलीधराच्या मंदिरात जाऊन भजन कीर्तन ऐकत बसायला तिला खूप आवडे. एका बाजूला अतिशय शुद्ध मंत्रोच्चारण, खडा आवाज, प्रत्येक मंत्राचा माहित असलेला शास्त्रोक्त अर्थ तर दुसरीकडं तेवढीच गोड वाचा, सोज्वळ स्वभाव आणि सौन्दर्य ह्यामुळं वयाच्या पंधराव्या वर्षीपासूनच विमलाला स्थळे येऊ लागली. पण जो पर्यंत मुलगी हो म्हणत नाही तो पर्यंत लग्नाविषयी बोलणे नाही या तत्वावर ठाम असलेल्या  जनार्दन रावांनी कधीच विमलाला लग्नासाठी गडबड केली नाही. मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाल्यावर मात्र विमलेच्या आईनं घरात लग्नाचा घोषा  सुरु केला. त्या काळी  लग्नासाठी सोळा वर्षे वय म्हणजे 'डोक्यावरून पाणी गेलं' अशी परिस्थिती असताना वयाच्या सतराव्या वर्षी पण मुलीचे लग्न न झाल्याने विमलाच्या आईला अतिशय चिंता वाटत होती. शेवटी तिच्या हट्टापुढं हात टेकून विमलाने लग्नासाठी स्थळे बघायला होकार दिला. 
अगदी पहिलेच स्थळ आले वासुदेव जोशी यांचे. पंचवीस वर्षे वय, ऊंच, दिसायला रुबाबदार असलेल्या वासुदेव रावांनी पुण्याच्या फर्ग्युसन मधून डिग्री घेतली होती आणि आता ते आपल्या गावी, नागपुरात सरकारी कचेरीत काम करत होते.नागपुरात त्यांचा टोलेजंग वाडा  होता, शेतीवाडी होती, घरात सतत नोकर माणसांचा राबता असायचा. वासूदेवरावांचे वडील शेतीत आणि बागायतीच्या कामात लक्ष घालीत. एकूणच अतिशय श्रीमंत आणि सुयोग्य असं स्थळ होतं ते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, तिकडून होकारही आला. जनार्दन रावांची परिस्थिती बेताचीच असल्यानं आणि वासुदेव रावांचा हुंडा वगैरे प्रकाराला कडाडून विरोध असल्यानं साध्या पद्धतीनं पण अतिशय  साग्रसंगीत असं विमला आणि वासुदेवरावांचं लग्न झालं. 
लग्नानंतर वासुदेव रावांनी गावातून वाजत गाजत वरात काढली होती. घरी पोचता पोचता रात्रीचे नऊ वाजले.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून न्हाणं झाल्यावर विमलानं सगळ्यात आधी नेहमीच्या सवयीप्रमाणे बागेत जाऊन फुलं आणि दुर्वा आणल्या आणि सासूबाईंना विचारलं, "देवघर कुठं आहे सासूबाई, सोवळ्यात पूजा झाल्याशिवाय स्वयंपाकघरात शिवाशिव करत नाहीत आमच्यात, म्हणून म्हटलं आधी पूजा आटपून घ्यावी."
सासूबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला, बोलावं कि नको याचा त्या विचार करीत असताना मागून वासूदेवरावांचा मोठ्यानं आवाज आला. 
"इथं घरात देव नाहीत. तेव्हा हि सगळी नाटकं बाजूला ठेवा आणि आणि आधी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी दूध घेऊन या."
विमलेच्या पदरातून फुलं खाली पडली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या. 
"चल  सुनबाई, आधी आत चल " असं म्हणत सासूबाई विमलेचा हात धरून तिला आत स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. 
"आता काय सांगायचं पोरी तुला, वासूचा देवावर विश्वास नाही, वयाच्या बाराव्या वर्षी घरातले देव त्यानं बाहेर फेकून दिले. तुझ्या माहेरासारखं अगदी देवभोळी माणसं नसलो तरी सकाळी पूजा अर्चा, संध्याकाळी पर्वचा, सणासुदीला नैवेद्य आणि वर्षातून एकदा सत्यनाराणाची पूजा एवढं देवाचं अस्तित्व जपलं होतं घरी. वासू आधी असा नव्हता पण अचानक एक दिवस तावातावानं घरी आला, देवघरात जाऊन देवाच्या मूर्ती बाहेर घेऊन आला आणि 'आज पासून या घरात देवाला जागा नाही' असं म्हणून सगळ्या मूर्ती त्यानं फेकून दिल्या. ह्यांनी आणि मी सगळ्या पद्धतीनं त्याला समजावयचा प्रयत्न केला. आधी गोडीनं नंतर रागावून पण सांगितलं, मी चार दिवस अन्नपाणी पण घेतलं नाही. त्यावर शेवटी 'जर तुम्हाला देव घरी ठेवायचे असतील तर खुशाल ठेवा पण मग मी इथं राहणार नाही' असं म्हणून वासू घरातून निघून गेला. ह्यांनी मग माणसं पाठवून शोधून आणलं. तेव्हापासून देव घरातून गेले ते गेलेच, देवघराला टाळं लावलं. आम्ही तरी काय करणार सुनबाई, नवसानं झालेलं पोरं हे, जिवंत पोरापेक्षा काय मूर्तीतील देव महत्वाचा आहे होय? देव काय गं, मनात असला तर झालं, त्याची मूर्तिपूजा केली तरच आपण आस्तिक असं होत नाही, देव शेवटी आपल्यातच असतो कि, आणि जर हुडकायचाच असेल तर इतरांच्या मनात शोधावा असं एवढी वर्ष स्वतःला मनाला समजावत आम्ही जगतोय. घरात गणपती येत नाही कि गौर बसत नाही, हळदीकुंकवाला कुणालाही बोलवत नाही. आता आमचं काय, आम्ही आज आहे उद्या नाही पण तू आमच्या वासूला साम्भाळून घे. हा देवाच्या बाबतीतला तिरस्कार सोडला तर अगदी हिऱ्यासारखा आहे आमचा वासू.... अतिशय शांत आणि प्रेमळ. मगाशी मोठ्या आवाजात बोलला ना, ते तू देवाचं  नाव काढलंस म्हणून. मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना सुनबाई ?"
"इथं घरात देव नाहीत" या एकाच वाक्यापाशी सगळं आयुष्य संपल्यासारखं वाटलं विमलाला. त्या नंतर सासूबाईंनी म्हटलेला प्रत्येक शब्द विमलाच्या कानात शिसं ओतल्यासारखा होता. लहानापासून देवाला नैवेद्य न दाखवता अन्नाचा एक घासही घश्याखाली न गेलेल्या विमलाला देवाचं अस्तित्वच नाकारणाऱ्या घरी अन्न  गोड कसं  लागणार? सगळंच अशुद्ध आणि अवघड होऊन बसलं होत. विमलाची खूप काळजी घेणारे आणि प्रेम करणारे वासुदेवराव देवाचा विषय काढला कि दुर्वास रूप घेत. सरळ सरळ काय पण आड वाळणानं पण कधी विमलाची याचना त्यांनी ऐकली नाही. 
पण काहीच पर्याय नव्हता. फक्त नास्तिक आहेत म्हणून नवऱ्याला सोडून जाणं हे बालिशपणाचं होत आणि अर्थातच तो काळही तसा नव्हता. मनात कडवटपणा भरलेला असूनही विमला संसाराचं ओझं पेलत होती. दिवसातून एकदा तरी तिची नजर देवघरापाशी खिळून राही, कधी कधी देव तिच्या स्वप्नात येई तर कधी मंदिरात जाण्यासाठी तिचा जीव तळमळे, घरा शेजारी चालणाऱ्या आरत्या गणपती उत्सवात तिचं काळीज चिरत. घरात शेतीच्या कामांसाठी तसेच कुणी ना कुणी पाहुणे येत जात असल्याने जवळपास वीस पंचवीस लोकांचा स्वयंपाक रोज बनवावा लागे, विमला आपले मन त्यात गुंतवे,  तिचा बराचसा वेळ मनातल्या मनात स्तोत्र म्हणण्यात घालवी,  कधी वाचनालयातून पुस्तकं वाची तर कधी सासू बाईंची सेवा करी. वर्षभरानंतर घरात गोड बातमी मिळाली तेंव्हा पहिल्यांदा विमलाच्या ओठावर मनापासून हसू आलं. आता निदान वेळ घालवण्यासाठी अगदी आपल्या जवळचं  कुणीतरी येणार या विचारानेच तिला आकाश ठेंगणं झालं. त्यानंतर चित्राचा जन्म झाला आणि दोन वर्षानंतर चैतन्यचा. मुलांना झोपवताना विमला अंगाई ऐवजी गणपती किंवा मारुती स्तोत्र म्हणे, त्यांना महाभारतातल्या आणि रामायणातल्या गोष्टी हलक्या आवाजात सांगे जेणेकरून मुलांना नास्तिकतेच्या झळा लागू नयेत. 
वर्षे सरत गेली. सासू सासरे गेले आणि विमला आता विमलाबाई बनल्या. मुलांना मोठं करता करता, नवऱ्याची काळजी घेता आणि घरातला रोज वाढणारा गोतावळा सावरता विमलाबाई कधी चाळीशीच्या झाल्या ते कळलंच नाही. चित्राचं लग्न झालं, चैतन्य शिकायला पुण्याला होता. आता एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त विमलाबाई आणि निवृत्त झालेले वासुदेवराव राहत. 
मनातल्या एका कोपऱ्यात दाट अंधार ठेवून जगत असलेल्या विमलाबाईंची गात्रं आता शिथिल झाली होती. कधी कधी आपण घालवलेल्या आयुष्याचा त्यांना राग येई. पंचवीस वर्षांच्या संसारात आपल्याला आवडेल असं एकदाही करायला मिळत नसेल तर ह्याला कारावास का म्हणू नये? हे म्हणतात कि ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे पण जर त्या प्रेमापायी फक्त एकदा आपलं ऐकलं असतं तर काय झालं असतं ? दर वर्षी त्या वासुदेव रावांसमोर गाऱ्हाणे मांडायच्या, कार्तिक सुरु झाला की 'अहो या वर्षी घरी गणपती बसवूया की, फक्त दीड  दिवसाचा. घरी कुणीतरी पाहुणा आलाय असंच समजा. दीड  दिवसांनी विसर्जनच करायचं आहे मूर्तीचं . फक्त एकदा माझं ऐका, फक्त माझ्यासाठी.. परत कधीही काहीही मागणार नाही मी तुम्हांला. हवी तर शेवटची इच्छा समजा माझी.'
पण नाही, वासुदेवरावांनी एकदाही विमलाबाईंचं ऐकलं नाही. आयुष्यात प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असते, स्वतःला हवं त्या व्याख्येत दुसऱ्याला सुखी ठेवताच येत नाही. दुसऱ्याला सुखी ठेवायचं असेल तर स्वतःच्या तत्त्वांपासून थोडंसं वळण घेऊन त्यांना दुसऱ्याच्या परिभाषेत बसवायला हवं आणि हेच कधी वासुदेवरावांना कळलं नाही. 
________________________________________________________________
अडगळीच्या खोलीचा दरवाजा किरकिरला. दरवाज्यात चैतन्य उभा होता. 
"आई, सगळी तयारी झालीय, मोक्ष धामाकडं घेऊन जायचंय बाबांना."
"बर" असं म्हणत विमलाबाईंनी कोपऱ्यातली धुळीत ठेवलेली ट्रंक उघडली. लाल रंगाच्या सुती  वस्त्रात गुंडाळलेले देव बाहेर काढून त्या खालमानेने त्यांना निरखू लागल्या. 
"आई अगं चल लवकर आणि हे काय करत बसलीयेस? गुरुजी सांगत होते कि घरात १३ दिवस सूतक आहे तेव्हा देवपूजा करायची नाही आणि तू मात्र इथं......"
सकाळपासून पहिल्यांदाच विमलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मान वर करून  डबडबत्या डोळ्यांनी चैतन्य कडं बघून त्या शांतपणे म्हणाल्या "चित्राला माझ्या आंघोळीचं पाणी काढायला आणि देवघर झाडून ठेवायला सांग. आजच तर सूतक संपलंय घरातलं."


Monday, October 29, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ५

रेड लाईट मध्ये रात्री उभ्या असलेल्या बायका जी गोष्ट पैश्यासाठी करतात, लग्न होऊन नवऱ्याबरोबर सुखी असलेल्या बायका जे प्रेमापायी करतात तर सुखी नसलेल्या जबाबदारी म्हणून करतात, लग्न न झालेली एक नवथर तरुणी जी गोष्ट प्रेमात आकंठ बुडाली असल्याने किंवा कमीत कमी प्रेमाचा आभास निर्माण झाल्यानं एखाद्या अनाहूत क्षणी करते; ती गोष्ट आपण काय म्हणून केली असावी? खरं तर ह्या सगळ्याची 'गरज' तरी आपल्याला नाही, पैश्यासाठी हे सगळं करायचा तर संबंधच नाही, अमित बरोबर हे सगळं करण्याची कुठलीही जबरदस्ती किंवा जबाबदारीही नाही, राहता राहिला प्रश्न प्रेमाचा तर अमित एक चांगला मित्र आहे, चांगला माणूस आहे, कधी तरी तो त्याच्या कुटुंबाला देत असलेला वेळ बघून आपल्याला त्याच्याबद्दल ईर्ष्या पण वाटलेली आहे. पण तरीही आपण खरंच एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो की थोड्या मिनिटांच्या भौतिक सुखासाठी हे सगळं करू शकतो?
विश्वास आहे अथर्वचा माझ्यावर. त्याला वाटतं कि माझ्या आणि अमित मध्ये एक पवित्र मैत्रीचं नातं आहे, आणि खरंच होतं ते कालपर्यंत. पण आज? आज कुठं आहे मी नक्की? काय मिळवलं मी? अथर्वने दिलेल्या स्वातंत्र्याचं स्वैराचारात परिवर्तन झालंय. त्याला आपण एवढं गृहीत धरलंय की त्याचा विचारच करत नाही आपण कधी कधी. आज स्वतःला स्वतःची लाज वाटावी असं काहीतरी करून आलोय आपण आणि हे सगळं मागं परत जाऊन बदलता पण येत नाहीये. चांगल्या चालणाऱ्या आयुष्यात एका ग्रहणाप्रमाणं डाग लागलाय. काय करून हे सगळं आधीसारखं करता येईल?
विचार करून करून शांभवीचं डोकं फुटून जायची वेळ आलेली होती. काल रात्री अमितच्या घरी झालेल्या प्रसंगानंतर ती पहाटेच तिथून निघून स्वतःच्या घरी पोचली होती. घरी आल्यापासून रिक्लाईनर चेअर वर बसून सतत विचार करत असलेल्या शांभवीला बघून इंदू तिच्या खोलीत आली.
"मॅडम, कॉफी करून आणू का तुमच्यासाठी? पहाटे  पाच वाजल्यापासनं इथंच बसलाय तुम्ही. चेहरा पण किती ओढल्यासारखा वाटतोय. खूप थकल्यासारख्या वाटताय तुम्ही. थोडा वेळ झोपून घ्या हवं तर, पाय चेपून देऊ का?"
"इंदू मला आजच्या दिवस डिस्टर्ब करू नको अजिबात आणि सान्वी ला पण खोलीत पाठवू नको प्लिज."
"ठीक आहे मॅडम." म्हणत इंदू निघून गेली.
"खरंच काय कमी आहे आपल्याला म्हणून हे असं काही करायची बुद्धी सुचली? एवढा प्रेमळ नवरा आहे, गोड पोरगी आहे, सगळी सुखं पायाशी आहेत. देवानं  जगातलं जे सर्व चांगलं असेल ते पदरात टाकलंय  आणि आपण मात्र कशाचाही काही संबंध नसताना रात्री कुणाच्या तरी घरी त्याच्या बेड वर...... श्शी. नुसत्या विचारांनीच तीला किळस आली. खरंच आपण विरोध करू शकत नव्हतो का? विरोध कशाला, नुसतं सरळ सरळ सांगितलं असतं तरी बास होतं. अमित काही जबरदस्ती करत नव्हता आपल्यावर. त्या क्षणी त्याच्याजवळ थांबून तो जे काही मागत होता त्याला होकार किंवा नकार देणं हे पूर्णतः आपल्याचं हातात होतं. कालच्या रात्रीचा होणारा शेवट आणि त्यात असलेला प्रयेक क्षण आपल्याच हातात होता आणि आपण काय केलं? तर त्या सगळ्याला मूक होकार दिला. का? प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतंच... असायलाच हवं. माणसं आधी कारण शोधतात आणि मग सरासार विचार करून कृती करतात आणि आपण मात्र सगळं नको ते करून सावरून आता इथं बसून कारणं  शोधतोय. कारण मिळतंय का, तर ते पण नाही. आपल्याला अमित एक माणूस म्हणून किंवा एक मित्र म्हणून आवडतो, पटतो पण म्हणून काय झालं? अशी कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि म्हणून काय आपण सगळ्यांबरोबर ह्या पातळीला जातो का? कुणीतरी फक्त खूप जवळचा मित्र आहे म्हणून त्याच्या प्रत्येक इच्छेला हो म्हणतो का? मग अमितच्या बरोबरच हे सगळं का घडावं? कि खरंच आपल्याला प्रेम वगैरे झालंय ? काल त्याच्या मिठीत असताना आपल्याला एका क्षणासाठी पण अपराधी वाटलं नाही. कितीही किळसवाणं वाटतं  असलं तरी हे सत्य आहे कि काल त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला त्याच्याकडं आणखीन आकर्षित करत होता. चांगलं - वाईट, चूक - बरोबर, कायदेशीर - बेकायदेशीर, अधिकृत - अनाधिकृत ह्या सगळ्या संज्ञा क्षणभर बाजूला ठेवल्या तर आपण कालचा प्रत्येक क्षण अक्षरशः उपभोगलाय. आज मला स्वतःचा राग नक्की का येतोय? मी जे केलं ते चुकीचं होत हे माहित असूनही ते केलं म्हणून की ती चूकीची गोष्ट मनाच्या एका कोपऱ्यात त्या क्षणाकरता तरी आपल्याला कशी काय बरोबर वाटू शकते म्हणून?"
आज काही झालं तरी विचार शांभवीचा पिच्छा सोडत नव्हते. परत परत क्रम बदलून आलटून पालटून येणारे असंख्य विचार आणि त्यात बुडालेली शांभवी. तो दिवस आणि पाठोपाठ रात्र तशीच निघून गेली. त्यानंतरच्या दिवशी मात्र शांभवीन स्वतःला सावरलं आणि स्वतःसाठी नाही तर किमान सान्वी साठी तरी ती नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागली. अथर्व रोज फोन करायचा पण शांभवी त्याच्याशी पण जुजबी बोलायची, त्याच्याशी जास्त वेळ बोललं किंवा त्यानं फोन वर दाखवलेल्या प्रेमानं आणि काळजीनं पण शांभवीला आता गुदमरायला व्हायला लागलं. कामाचं कारण पुढं करून ती फोन ठेवून टाकायची. ह्या सगळ्या गोष्टीला आज एक आठवडा होत आलेला होता आणि न चुकता अमित चे रोज येत असलेले किमान शंभर मिस्ड कॉल्स आणि कितीतरी मेसेजेस ती निकराने दुर्लक्षीत करत होती. कुठंतरी मनात वाटायचं कि अमितला भेटावं आणि विचारावं की '' मला तरी उत्तरं  नाही मिळाली पण किमान तू हे सगळं का केलंस, काय विचार करून केलंस. जसा मला त्या क्षणी अथर्वचा विचार आला नाही तसा तुही इशाला विसरला होतास का? '.
अश्याच एका दुपारी घराची बेल वाजली. शेवंतानं दरवाजा उघडला आणि खालूनच "म्याडम, अमित साहेब आलेत बगा" असं ओरडून सांगितलं. शांभवीनं कितीदा तरी शेवंताला सांगितलं होतं कि कुणी आलं तर वर खोलीत  येऊन सांगत जा. सगळेच काही हवे असलेले पाहुणे नसतात. पण ऐकेल ती शेवंता कसली? आता या बाबतीत शेवंताची चूक पण म्हणता येणार नाही कारण आज जरी अमित आपल्याला नको असलेला पाहुणा वाटत असला तरी आठवड्यापूर्वी आपण याच अमितची वेड्यासारखी वाट बघायचो. अमित आला तर त्याला 'कोण हवंय , कशाला हवंय' असले प्रश्न विचारायचे नाहीत हे आपणच मागं  एकदा शेवंताला सांगितलं होत. त्या बिचारीला तरी काय माहित म्हणा कि हव्या असलेल्या आणि नको असलेल्या व्यक्ती मध्ये फक्त एका क्षणाचा फरक असतो. 
खाली जावं कि नको असा विचार करत असतानाच दरवाज्यावर नॉक ऐकू आला. 
"आत येऊ का शांभवी?" अमितनं खालच्या आवाजात शांभवीला विचारलं. 
"कशाला आला आहेस अमित? मी तुझे कॉल्स घेत नाहीये, मेसेजेस ना उत्तर देत नाहीये. ह्याचा अर्थ कळतो ना तुला?"
"हो आणि हे सगळं तू कशासाठी करत आहेस हे समजून घ्यायलाच आलोय मी इकडं" आत येत अमित म्हणाला. 
"त्या रात्री झालेलं सगळं माहित असतानाही तुला अजून काही समजून घ्यायचं आहे?"
"कम ऑन  शांभवी. ग्रो अप. आपण काही लहान नाही आहोत. त्या रात्री जे काही घडलं त्या बद्दल आपण नक्कीच बोलू शकतो, त्यावर एकत्र बसून विचार करू शकतो आणि नंतर एक निर्णय घेऊ शकतो. हे बघ, तुला दुखवायचं नाही आहे मला पण त्या दिवशी जे काही घडलं ते आपल्या दोघांच्या सहमतीनेच घडलं आणि असं असताना तू एकटीच माझ्याशी न बोलण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतेस? जे काही झालं त्या नंतर मी पळून नाही गेलेलो. त्या सगळ्याची जबाबदारी घेतोय आणि एका सगळ्यात जवळच्या मैत्रिणीशी त्या संबंधात बोलायला आलोय. तुला आवडो किंवा न आवडो पण तिला माझ्या मनातली गोष्ट सांगणं आणि गढूळ झालेलं नातं परत एकदा स्वच्छ करणं हे माझं कर्तव्य आहे."
"का करतोयस हे सगळं अमित? नकोय मला कसलही स्पष्टीकरण. झालेल्या चुकीला आणि त्याबरोबर गढूळ झालेल्या आपल्या नात्याला आता विसरून जाणंच ठीक आहे अमित."
"सगळ्यात आधी शांभवी, झालेली गोष्ट 'चूक' आहे कि नाही हे तू कोण ठरवणार आणि जरी ती चुकीची असेल तरी  नात्यात झालेल्या एका चुकीचं प्रायश्चित्त किंवा त्या चुकीची किंमत ते नातंच असावं हा तुझा हट्ट का?"
"कारण मी असं जगू शकत नाहीये अमित. घुसमट होतीय माझी आणि जे काही झालं त्याचं विश्लेषण करायचंच नाहीये मला अमित. सगळं मागं टाकून फक्त पुढं जायचं आहे मला. बस्स.."
"एक आठवडा झाला. सगळं मागं  टाकू शकलीस? सगळं जाऊ दे पण झालं त्यातलं एक टक्का तरी विसरू शकलीस ? नाही ना? समस्येपासून पळून जाऊन काही मिळत नाही शांभवी, उलट तू जेवढी लांब जाऊ बघशील ना, त्यापेक्षा लांब तुझी समस्या तुझा पाठलाग करेल आणि परत तुला ती तुझ्या समोर तशीच उभी राहिलेली दिसेल. अगं काय अवस्था करून घेतली आहेस एका आठवड्यात शांभवी? खरंच स्वतःच्याआयुष्याची वाट लावावी एवढं काही झालंय का?"
"अच्छा? म्हणजे काहीच झालं नाही आहे का?" शांभवी उपरोधाने म्हणाली. 
"तू परत एकदा चुकीचा विचार करतेयस शांभवी. आपण बसून बोलूया तरी. मगच उत्तरं मिळतील ना आपल्याला? एकदा ऐक  माझं.. प्लीज"
"तुझं "एकदा" ऐकूनच ही अवस्था झालीय माझी." शांभवीनं परत टोमणा मारला. 
"म्हणजे, सगळी चूक फक्त माझीच आहे का? मी सांगितलं आणि तू ऐकलंस? का? तुला बांधून ठेवलेलं होतं का मी? की जबरदस्ती केली होती तुझ्यावर? जाऊ दे शांभवी. तुला समजावून सांगायला आणि झालं तर तुला होत असलेला त्रास कमी करायला आलो होतो मी. जर तुला हे असंच बोलायचं असेल तर निघतो मी." अमित रागानं बोलला आणि उठून दरवाज्याकडे निघाला. 
"थांब अमित. सॉरी. माफ कर मला. थोडं जास्तच टोकाचं बोलले मी. काय करू रे, आज आठवडा झाला आणि विचार करून वेड लागायची वेळ आलीय. मी काय करतेय ते माझं मलाच कळत नाही आणि झालेली घटना पण अशी आहे कि कुणाला सांगू  शकत नाही आणि एकटी सहन पण करू शकत नाही."
"मला सांग शांभवी, बोल माझ्याशी. सगळं.. अगदी तुला जे काही वाटतंय ते. माझ्यावर राग येत असेल तर तो पण बाहेर काढ, रागाव मला, चीड माझ्यावर पण असं बोलणं सोडू नको. तुझा अबोला नाही सहन करू शकत मी."
"अरे अमित, मी तुझ्यावर काय चिडणार, काय राग काढणार? माझी पण तेवढीच चूक आहे ह्या सगळ्यात. सुरुवात तू केली असलीस तरी ते कस संपवावं हे माझ्या हातातच होतं, आणि ते मी अश्या पध्द्तीने का संपवलं हेच कळत नाहीये मला. गेल्या आठवड्या भरात त्या 'का' चंच कारण शोधतीये पण ते सापडत नाहीये. तुझ्याकडं उत्तर आहे का रे आपण केलेल्या ह्या सगळ्याचं? उद्या कुणी विचारलं कि का केलंस हे सगळं, तर चार शब्दात देता येईल आणि समोरच्याला पटेल असं उत्तर आहे का तुझ्याकडं?"
"इथंच चुकत आहेस शांभवी. झालेल्या प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना पटेल असं उत्तर हुडकण्याचा अट्टाहासच का करावा आपण? तुला आणि फक्त तुला पटेल असं एक उत्तर मिळालं तर बास आहे ना? होऊन गेलेल्या क्षणाचं  प्रमाणापेक्षा जास्त विश्लेषण करून आपण त्यातली मजाच घालवतो नाही? एखादा क्षण जसा समोर आला आणि जसा आपल्याला घालवावासा वाटला तसा तो का साजरा करू नये? आणि तरीही तुला माझ्याकडून 'माझं' असं कारण ऐकायचं असेल तर शांभवी, मला तू खूप आवडतेस, एका मैत्रिणीपेक्षा फार जास्त आवडतेस. तुझा सहवास आवडतो मला. तुला झालेला आनंद मला पण हसवून जातो, तुला झालेला त्रास माझ्या डोळ्यात पाणी घेऊन येतो. त्या दिवशी न ठरवताही अचानक झालेल्या घटना, मला बरं  नसताना तुझं माझ्याजवळ एकटं असणं, तू माझी घेतलेली काळजी आणि त्या रात्री अंगावर येणारा एकांत या सगळ्या जोडल्या गेलेल्या प्रसंगातून जन्मलेली माझी एक प्रतिक्रिया आणि अर्थातच त्या कमकुवत क्षणी तेवढाच कमकुवत असलेला तुझा विरोध... यापलीकडे काहीच विचार मी तरी केलेला नाही. आणि तू पण तो करू नयेस असं मला वाटतं. मला फक्त एका गोष्टीचं खरं खरं उत्तर दे."
"काय?" शांभवीनं शांतपणे विचारलं.
"त्या दिवशी माझ्या जवळ असताना तुला दुसऱ्या कुणाची आठवण आली का? तू आत्ता  एवढा आटापिटा करून  विचार करत असलेलं एक तरी कर्तव्य तुला माझ्या मिठीत आठवलं का?"
 "नाही म्हणजे....नाही आठवलं मला दुसरं काही... का कोण जाणे पण खरंच नाही "
"नाहीच आठवणार तुला, कारण त्या दिवशी तू स्वतःचीच होतीस आणि उरलेली माझी होतीस. ह्या न बदलणाऱ्या सत्यासारखी आणखी एक गोष्ट पण बदलणार नाही आणि ती म्हणजे मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. बाकी काहीही करायला सांग, मी नक्की करेन पण हे नातं मात्र तोडू नको." 
"काय बोलतोयस अमित? अरे काही कळतंय का तुला? तुझ्या आयुष्यात इशा, अनिश ह्यांना काहीच महत्व नाही का? त्यांच्याशी  असलेल्या एका विश्वासाच्या नात्याला किंमत नाही?"
"सगळं मिसळू नको शांभवी, परत गफलत करतेयस तू. मी कुठं म्हणालो कि माझं इशावर प्रेम नाही किंवा मी  अनिशचा विचार करत नाही. माणूस म्हणजे नक्की काय गं .. बाहेर असलेल्या अनेक प्राण्यांसारखा एक प्राणी.. बहुधर्मचारी. एकापेक्षा जास्त पार्टनर्स बरोबर माणूस फक्त संबंधच ठेवू शकत नाही तर प्रेमही करू शकतो. पण त्याच्या स्वैराचाराला संस्कृतीच्या भिंती बांधून त्यावर कायद्याचं कुंपण घालून आपण त्याला अश्यासाठी जायबंदी केलं आहे कि ज्यामुळं सामाजिक व्यवस्था आणि शांतता टिकून राहील. पण तरीही प्रत्येकजण ह्यावर एकदा तरी कुरघोडी करतोच. हि कुरघोडी शारीरिकच असावी असं नाही, मानसिकरीत्या आपल्यातला प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी व्यभिचार करतोच की. आज मी जेव्हा तुझ्यावर प्रेम करतोय म्हणजे कुणावर तरी अन्याय झालाच पाहिजे असं समीकरण का? तू मला आवडतेस, तुझं असणं , तुझा सहवास आणि स्पर्श मला हवाहवासा वाटणं म्हणजे 'चूक' हे कायदा म्हणत असला माझ्यातला 'माणूस" नावाचा प्राणी तसं  म्हणत नाही. ह्या चूक-बरोबर च्या पलीकडं जाऊन स्वतःला काय हवंय, हे मिळणाऱ्या एका आयुष्यात करणं हा खरंच  एवढा गुन्हा आहे का? आज कदाचित त्या रात्री घडलेल्या प्रसंगामागचं मला मिळालेलं उत्तर हे कुठंतरी तुझं पण उत्तर असू शकेल. फक्त एकदा दृष्टिकोन बदलून बघ. तू काय करावंस आणि करू नयेस हा आजही तुझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तुझ्या कुठल्याही निर्णयावर मी एका अक्षराने प्रश्न करणार नाही किंवा तू तुझा निर्णय बदलावास अशी जबरदस्ती पण करणार नाही. फक्त एक सांगेन शांभवी, सगळी सरमिसळ करून गुंता करून त्यात अडकण्यापेक्षा कधीतरी सगळी बंधनं झुगारून फक्त तुला काय वाटतं आणि तुला काय हवंय  ह्याचा विचार कर आणि तुझ्या त्या उत्तराची मी प्रतीक्षा आणि आदर दोन्ही करेन. इट्स अ प्रॉमिस. चल निघतो."
निघून जात असलेल्या पाठमोऱ्या अमितकडं बघून शांभवी ओठाच्या कोपऱ्यातून हसली. आभाळ निरभ्र झाल्याचा तिला क्षणभर भास झाला.


क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)

Wednesday, October 24, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ४

गोव्याहून परत आल्यावर शांभवी खूप खुश होती, खूप सारी पैंटिंग्स, अथर्वंबरोबर मिळालेला भरपूर वेळ, त्याच्याबरोबर घालवलेले जादुई क्षण ह्यांनी मंतरलेले सात दिवस कसे गेले हे तिला कळलंच नाही. तसं  सांगायचं झालं तर तिच्या डोक्यात अमितच्या प्रस्तावाचं  काय करावं ह्याचे विचार चालूच होते पण तरीही कुठंतरी अथर्वने दिलेल्या आश्वासनामुळं ती निर्धास्त होती. शेवटी खूप विचार केल्यावर तिला हे पटलं  कि अथर्वने सांगितलेलं काही चुकीचं नाहीये. राहता राहिला अमितचा विचित्र स्वभाव तर त्यावर 'आपणच थोडं लांब राहिलं  तर आपल्याला त्रास नाही होणार, जर आपण कामापुरतंच बोललो तर थोड्या दिवसांनी सगळं ठीक होईल' असा विचार तिनं  केला. परत घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी तिनं अमितला फोन लावला.
"हॅलो अमित."
"शांभवी, तूच आहेस ना नक्की, काही स्वप्न वगैरे तर बघत नाहीये ना मी.. त्या दिवशी तू रागानं फोन ठेवून दिलास आणि तू मला परत उभ्या आयुष्यात कधीच फोन करणार नाहीस असं वाटलं होतं मला. बऱ्याचदा वाटलं कि फोन करावा पण धीर झाला नाही. खरं तर तुझी खूप आठवण ..... " पलीकडून अमितचा आवाज आला.
"अमित, थोडं थांबशील का बोलायचं? तुला काय वाटलं, कसं  वाटलं हे समजून घेण्यासाठी मी फोन केलेला नाहीये. हे बघ, तुझ्या प्रस्तावाबद्दल मी अथर्वशी बोलले. त्यानं सुचवल्याप्रमाणं आणि अर्थातच मला पण ते पटलेलं असल्यानं, मला असं वाटतं  कि मी तुझ्या प्रस्तावाचा विचार करावा." अमितचं बोलणं मध्ये तोडत अतिशय गंभीर आणि व्यवसायिकपणे शांभवीने एका दमात सांगून टाकलं.
"मला विश्वासच बसत नाहीये शांभवी कि तू होकार देतीयेस. मग कधी भेटूया? कुठं भेटूया? कि तू येतेस माझ्या ऑफिसला? सगळंच ठरवता येईल."
"थांब अमित, माझं अजून बोलून झालेलं नाहीये. हे अग्रीमेंट फायनल करण्याआधी माझ्या काही अटी  आहेत. एक तर एकदा मला काम आणि त्याची डेडलाईन दिल्यावर शंभरदा त्याबद्दल विचारलेलं आवडत नाही, दुसरं म्हणजे एकदा थीम काय आहे हे पक्कं  झाल्यावर सारखं सारखं त्यामध्ये बदल केले तर मला चालणार नाही. हे बघ अमित, पैंटिंग्स करणं हे एक्सेल शीट मध्ये डाटा भरून रिपोर्ट बनवण्यासारखं नसतं. त्यात सारखे सारखे बदल नाही करता येत त्यामुळं हवा तेवढा वेळ घे पण सगळं फायनल झाल्यावरच मी काम सुरु करेन."
"ठीक आहे, तू म्हणशील तसेच होईल." यावेळेस मात्र अमितचा आवाज आधीसारखा उत्साही वाटला नाही.
"थँक्स अमित. मग तू संबंधितांशी बोलून सगळं फायनल झाल्यावर फोन कर. नंतरच भेटू आपण." असं म्हणून शांभवीने फोन ठेवून दिला.
शांभवीनं विचार केला, 'आपण उगाचच म्हणतो जग वाईट आहे, माणसं  स्वार्थी आहेत. खरं तर आपण संधी देतो लोकांना, त्यांना आपल्या आयुष्यात उगाचच जास्त शिरकाव करू देतो आणि नंतर आपणच देऊ केलेल्या संधीचा त्यांनी फायदा उठवला कि रडत बसतो. आपण बरं  आणि आपलं काम बरं  असं राहीलं तर कुणीच आपलं वाकडं करू शकत नाही. अर्थात हे सगळ्या बाबतीतच खरं नसेलही पण तरीही जिथं शक्य आहे तिथं तरी असं वागणं आपल्याच हातात आहे.'  
जवळपास आठवड्यानंतर अमितचा फोन आला. ठरवल्याप्रमाणं त्यानं त्याच्या मॅनॅजमेन्टआणि टीमशी बोलून सगळं ठरवलं होतं. आता फक्त शांभवीला ते सगळं डोळ्याखालून घालायचं होतं. शांभवी त्यानंतर प्रत्येक मीटिंग्सना हजर राहिली, पण अर्थातच तिनं  कामाचं सोडून बाकी कशातही लक्ष दिलं  नाही. आश्चर्य म्हणजे अमित पण तिच्याशी मागच्या वेळेसारखं काहीच बोलला नाही. कधी कधी शांभवीला वाटायचं आपल्या वागण्यामुळं हा बदलला आहे तर कधी अमितचं  कामात गुंतून जाणं  बघितलं कि वाटायचं कि कामाच्या बाबतीत अतिशय केंद्रित असल्यानं हा बोलत नाहीये. प्रदर्शनात बघितलेला अमित आणि इथं ऑफिसात कामात बुडालेला अमित हि अगदी दोन वेगवेगळी वव्यक्तिमत्वं होती. टीम ला समजावून सांगून, त्यांच्या अगदी छोट्या शंका कान देऊन ऐकून, त्यांचं त्यांना कळेल अश्या पद्धतीनं निरसन करणे, कामाचा ताण वाटू नये अश्या पद्धतीनं हसून खेळून काम करून घेणे... डिजिमॅक्स ने एवढी प्रगती का आणि कशी केली असेल ह्याचं जिवंत  उत्तर तिच्या समोर होतं. काहीही असो पण अमित तिला पहिल्यांदा वाटलं तसा अजिबात नव्हता. हळूहळू शांभवीनं पण त्याच्याशी नॉर्मली वागा-बोलायला सुरुवात केली.
अश्याच एका दिवशी मीटिंगसाठी डिजिमॅक्स मध्ये आलेली शांभवी कॉन्फरन्स रूम मध्ये बसून फायनल झालेल्या थिम बघत होती. अचानक आपल्या मग कुणीतरी उभं आहे असं वाटून ती मागं वळली आणि अमित ला बघून हसत म्हणाली "ये अमित, तुझ्या केबिनमध्येच येणार होते तुला भेटायला, तुझ्याशी या लोकेशन्स बद्दल बोलायच  आहे."
"बोल कि."
"आपण हि जी सगळी लोकेशन्स फायनल केली आहेत ती एकदम परफेक्ट आहेत, फक्त हे एकच सोडून."
"कुठलं?" अमितनं तिच्या लॅपटॉप मध्ये डोकावत बघितलं.
"सायलेंट व्हॅली  मध्ये असलेलं हे लोकेशन. खूप गर्द झाडी आहेत सगळीकडं. इतकी दाट कि वर आभाळ दिसत नाही कि खाली जमीन. पैंटिंगमध्ये संपूर्ण कॅनवास भरून फक्त हिरव्या रंगाच्या चिक्कार शेड्स येणार."
"आणि तेच मला हवंय शांभवी. मला या पेटिंग मध्ये सगळे हिरवे रंग हवे आहेत, सगळ्या शेड्स हव्या आहेत आणि ह्या पेटिंग च नाव असेल 'दृष्टिकोन'. सध्या शब्दात सांगायचं तर हेच बघ कि, आपलं आयुष्य पण असंच असतं नाही? रोज तोच दिनक्रम, तेच घर, आसपास असणारी तीच माणसं, त्याच जागा, अगदी थोडा थोडा फरक असतो प्रत्येक दिवसात. जर ढोबळमानाने बघशील तर किती एकसारखं आयुष्य जगतो आपण...अगदी या जंगलासारखं. पण थोडा दृष्टीकोन बदलून बघितला कि कळेल की हे सगळं अगदीच कंटाळवाणं नाहीये. वरवर दिसणाऱ्या त्या एकसारखेपणाच्या पण वेगवेगळ्या छटा आहेत आपल्या आयुष्यात. जरी एका परिघामध्ये बांधलेलं असलं तरी त्यात पण निराळेपण आहे. प्रत्येक हिरव्या छटेचं एक वेगळं अस्तित्व आहे किंवा असं म्हण हवं तर, कि ती छटाच त्या हिरव्या रंगाचं खरं अस्तिव आहे."
"किती खोलात विचार करतोस अमित. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा खरं सांगायचं तर खूप उथळ आणि कृत्रिम वाटलेलास मला. पण आता जेव्हा तुझ्यासोबत वेळ घालवला तेव्हा कळलं कि मी उगाचच  चुकीचा विचार करत होते. अथर्व म्हणाला तसा तू खूप हुशारच नाहीत तर मनानं पण चांगला आहेस"
"हाहाहा.. म्हणजे? इतके दिवस तू काय मला प्ले बॉय समजत होतीस कि काय? अगं, तुला थोड्या वेळापूर्वी म्हणालो ना, तशी माझ्या आयुष्याच्या कॅनवास वर तुझ्या रूपानं एक नवीन छटा शोधत होतो मी, बाकी काही नाही. आयुष्य तर वर्षानुवर्षे असंच चाललंय आणि असंच चालणार. नवनवीन माणसं येतात आणि त्यांच्या छटांनी आपलं सो कॉल्ड कंटाळवाणं आयुष्य रंगीत बनवतात. माझा स्वभाव ह्या ऑफिस बाहेर खूप वेगळा असतो कारण असं दिवसरात्र खूप गंभीर राहायलाच येत नाही मला. सगळ्या गोष्टीत जर मी गंभीर राहायला लागलो तर लवकरच भिंतीवरच्या फोटो फ्रेम मध्ये बसावं लागेल. तुझ्याशी दोन वेळा बोलल्यावर कळलं कि तू माझ्या विरुद्ध आहेस, खूप वेगळी आहेस, तुला हे सगळं नाही पटत आणि मग मी पण सोडून दिलं कारण मला तुझ्याशी फक्त मैत्री करायची होती. तुला त्रास द्यावा किंवा तुला न पटणारं काहीही बोलावं किंवा वागावं असं माझ्या कधीच मनात नव्हतं."
"सॉरी अमित, तुला ओळखू शकले नाही मी. तुझ्या वरवरच्या स्वभावाला बघून तुझ्या बद्दल नाही नाही ते आडाखे बनवले मी."
"अगं बाई सॉरी वगैरे म्हणू नको. मला जाम  टेन्शन येतं या सॉरीचं . "
"ठीक आहे नाही म्हणत सॉरी. पण आपल्या मैत्रीचं सेलेब्रेशन करायला संध्याकाळी ऑफिस नंतर कॉफी घेशील माझ्याबरोबर? बघूया, माझ्या आयुष्यात हि नवीन छटा किती शोभून दिसते ते."
"नक्कीच मॅडम. आय एम ऑल युवर्स." अमित हसत हसत उत्तर दिले.
त्या दिवशी सुरु झालेली मैत्रीची छटा हळूहळू एवढी दाट  होत गेली कि त्या छटेनं शांभवी आणि अमितचा सगळं कॅनवास व्यापून टाकला.
अमित केतकर.. जिवंत व्यक्तिमत्वाचं एक ज्वलंत उदाहरण. अमितच्या बरोबर असलं कि तुम्हाला उदास व्हायला, विचार करायला आणि शांत बसायला परवानगीच नाही जणू. एवढ्या वर्षांत शांभवी एवढा वेळ पहिल्यांदाच हसली असेल. जेवढा वरवर जॉली दिसायचा त्याहूनही अधिक खोल विचार करणारा, सगळ्यांची काळजी करणारा अमित. सकाळी गुड मॉर्निंग पासून रात्री गुड नाईट पर्यंत मेसेजेस ने शांभवीचं आयुष्य व्यापणारा, रोज न चुकता कॉल करणारा, आठवड्यातून दोनदा शांभवीला हक्कानं भेटणारा अमित. अमितच्या रूपानं तिला एक खूप जवळचा मित्र मिळाला. शांभवीला आता एकटं वाटायचं नाही. अमित तिला एकटं वाटूच द्यायचा नाही. या मैत्रीखातर अगदी अगदी आपलेपणानं आमंत्रण दिल्यानं शांभवी अमितच्या घरी पण जाऊन आली. त्याची बायको इशा खूप मनमिळाऊ आणि मुलगा अनिश गोड  होता. दोघांशी तिची खूप छान मैत्री जमली. मग वेळ मिळेल तेंव्हा ती सान्वी ला घेऊन अमित च्या घरी जाई. सगळे मिळून मस्त मजा करत, फिरायला जात, खरेदीला एकत्र जात. . कधी एखाद्या रविवारी अमित, इशा आणि अनिश शांभवीकडं  येत. अथर्व आणि अमितची ड्रिंक्स पार्टी, इशा आणि शांभवीची गप्पा पार्टी तर सान्वी आणि अनिश ची दिवसभर धमाल चाले. एकूणच काय अगदी दृष्ट लागावी असं सगळं चाललं होत.
-----
"चल शांभवी, आज खूप थकलोय मी. घरी लवकर निघतोय." मीटिंग रूम मध्ये बसलेल्या शांभवीला अमित म्हणाला.  अमितच्या चेहऱ्यावरून त्याला होत असलेला त्रास स्पस्ट जाणवत होता.
"काय झालं अमित?"
"अंग, डोकं आणि अंग जाम  दुखतंय. ताप  येणार बहुतेक."
"चल मग डॉक्टर कड जाऊयात आधी"
"अगं नको, घरी जाऊन झोपतो थोडा वेळ. बरं वाटेल.
"ठीक आहे, मी पण निघतेय आता. चल तुला घरी सोडून मगच पुढं मी घरी जाईन."
"नको शांभवी. मी जाईन एकटाच."
"वेडा आहेस का अमित? या अवस्थेत तू गाडी  कशी चालवशील? मला काही ऐकायचं नाही. तू गपचूप माझ्याबरोबर चल."
हम्म. ठीक आहे" शांभवीला विरोध करण्याइतकी शक्ती पण अमित मध्ये नव्हती.
घरी पोचल्यावर बघितलं तर दरवाजा बाहेरून लॉक होता. "हे काय, इशा कुठं गेली?" शांभवीने विचारलं.
"सांगायचं राहिलंच तुला. ती तिच्या मम्माकडं  गेलीय. दोन दिवसांनी येईल. तू काळजी करू नको. मी पडतो जाऊन. तू पण निघ आता..
"थोडं गप्प बसणार का तू अमित?" म्हणत शांभवीन लॅच उघडला. "तू फ्रेश हो, मी मस्तपैकी गरम कॉफी बनवते तो पर्यंत." असं म्हणत ती किचनमध्ये घुसली सुद्धा.
दहा मिनिटांत दोन मग मध्ये कॉफी घेऊन ती बेडरूम मध्ये पोचली तर अमित गाढ झोपला होता. अंगाला हात लावून बघितलं तर खरंच ताप  चढला होता. त्याला उठवून तिनं आधी कॉफी प्यायला  लावली आणि औषध दिलं.
अमित परत झोपी गेल्यावर बराच वेळ ती हॉल मध्ये काहीतरी वाचत बसली होती. ईशाला फोन करून तिलाही अमितच्या तब्ब्येतीबद्दल सांगितलं. ईशा दुसया दिवशी पहाटेच निघून सकाळी दहा पर्यंत घरी पोचणार होती. जर ताप उताराला नसेल तर डॉक्टरला बोलवायचं असं ठरवून तिनं आत जाऊन बघितलं तर अमितचा ताप बऱ्यापैकी उतरला होता. रात्रीसाठी अमितला खायला काहीतरी बनवून ठेवावं आणि मग घरी निघावं असा विचार करत उठून किचन कडं निघणार तेवढ्यात मागून अमितचा आवाज आला "शांभवी कुठं निघालीस?"
"अरे अथर्व उठलास होय?" शांभवीनं माग वळून उत्तर दिलं. "अरे तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवण्यासाठी  निघाले होते. थोडं खाऊन घे म्हणजे बरं  वाटेल तुला."
"तू माझ्याजवळ बसलीस तर मला जास्त बरं  वाटेल.'
"हो, पण आधी काहीतरी खायला घेऊन येते."
"नाही,आधी इकडं जवळ येऊन बस." लहान मुलासारखं गाल फुगवून अमितनं असं म्हटल्यावर शांभवीला हसू आलं. ती परत मागं  वळून अमितिच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणाली,
" बोल, काय झालं? डोकं दाबून देऊ का? "
"शांभवीचा हात आपल्या हातात घेऊन अमित म्हणाला " नको, फक्त एवढंच कर कि मला सोडून कुठं जाऊ नको."
"हो रे बाबा, मी कुठं जाणार आहे?"
बराच वेळ अमितशी इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर शांभवीनं वरण भाताचा कूकर लावला. ताप पण बऱ्यापैकी उतरला होता. अमितच्या हट्टाखातर दोघांनी मिळून जेवण केलं आणि मग ते थोडा वेळ टीव्ही बघत बसले. अथर्व घरी नसल्याने तिला तशी काही घरी जायची गडबड नव्हती. आज उशीर होईल हे सांगायला तिनं  इंदूला फोन केला तेव्हा कळालं कि सान्वी नुकतीच झोपी गेली आहे. रात्रीचे नऊ वाजल्यावर मात्र शांभवी अमितला म्हणाली, "बर निघते मी आता अमित, खूप उशीर झालाय."
"थांब अजून थोडा वेळ, खरंच मला एकट्याला सोडून जाऊ नको." असं म्हणत अमितनं तिला घट्ट मिठी मारली. का कोण जाणे पण शांभवीन मिठीतुन बाहेर पडायचा प्रयत्न केला नाही. ती तशीच बसून राहिली. 
पाच मिनिटांनंतर मिठी आणखी घट्ट होत गेली आणि अमितनं आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. 
"अमित, काय करतोयस?" शांभवीनं विचारल आणि त्याला हलकेच बाजूला केलं. पण त्या कृतीमध्ये प्रतिकार नव्हता, त्या शब्दांमध्ये विरोध नव्हता. 
"आज काहीही बोलू नको शांभवी, प्लीज. फक्त एकदा, माझ्यासाठी." असं म्हणत अमितनं तिला परत मिठीत घेतलं.
नियती म्हणा किंवा विधिलिखित म्हणा, आपण कितीही बदलायचा प्रयत्न केला तरी बदलले जात नाहीत. उलट दैवाचे फासेच असे पडतात कि आपल्याला नक्की काय होतंय, का होतंय, जे होतंय ते योग्य कि अयोग्य, त्याचा परिणाम काय होणार ह्या सगळ्याचं  विश्लेषण करण्याचा पुरेसा वेळही न मिळता सगळं अचानकच बदलत जातं, आपल्याला काही कळायच्या आधी आपण एका गूढ गर्तेच्या मध्यावर पोचलेलो असतो. आजूबाजूला डोळे उघडून बघितलं कि ह्यातून बाहेर पडावंसं वाटतं पण कुठंतरी खोल आतमध्ये गुरुत्वाकर्षण एवढं जास्त असतं  की  आपण त्यात ओढले जातो... आपल्याही नकळत. 

अशाच एका अज्ञात दुबळ्या क्षणी अमितच्या मिठीत शांभवीसोबत सभोवतालची रात्र पण विरघळत गेली.


क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)

Sunday, October 21, 2018

कुछ नगमे

हमने जब प्यार में उनके, सब हदें पार कर दी
और लगा हमने उनसे आशिकी बेशुमार कर दी
देखा मुड़ के क्यों रोशन है आज हमगुज़र मेरा
जलाके आशियाँ मेरा ही उन्होंने रौशनी थी कर दी।

Saturday, October 20, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग 3

गोव्याच्या अंजुना बीचवर शांभवी हातात थंडगार मॉकटॆल घेऊन रिक्लाईनर चेअर वर पहुडली होती. समोरच सान्वी आणि इंदू वाळूत किल्ला बनवत बसल्या होत्या. इंदू ही बंगल्यावर काम करणाऱ्या शेवंताची मुलगी. वीस वर्षांची इंदू पण शेवंताबरोबर बंगल्यावर मदतीला येऊ लागली. हसरी, बडबडी पण कामसू अशी इंदू थोड्या दिवसात सान्वी ची इंदू ताई बनली.
"घरी हीचा बाप दारु पिऊन बडवतो आमास्नी आणि माह्या पोरीवर बी त्या भ***ची लई वंगाळ नजर हाये बगा. म्हनून म्या पोरीला बी माह्या संगट हिकडं घिऊन आली. भाईर ऱ्हाईली तर काय बी करू शकनार नाय त्यो. अवं काय सांगू म्याडम, अवं माजघरात झोपत्या पोर तर रात्री धा येळा डोकावतोय त्यो लांडगा." असं म्हणून शेवंतानं डोळ्याला पदर लावला.
शेवंता आणि इंदू सकाळीच यायच्या. मग झाडलोट, साफ सफाई, बागेची देखभाल, धुणं भांडी आणि वरची सगळी कामं करायच्या, शांभवीला स्वयंपाकात मदत करायच्या आणि संध्याकाळी सहा वाजता परत निघायच्या. शहराबाहेर असलेल्या ह्या मोठ्या बंगल्यात शांभवीला कधी कधी खूप एकटं वाटायचं आणि त्यात आजकाल अथर्व पण महिन्यातून दहा पंधरा दिवस दौऱ्यावर असायचा. अश्या वेळी दिवसा शेवंताचा आणि रात्री, बंगल्याबाहेरच खोलीत राहणाऱ्या आणि बंगल्याची सेक्युरिटी बघणाऱ्या मुरारीचा तिला आधार होता.
"शेवंता, मी इंदूला आमच्याकडं ठेवून घेऊ का? ती सान्वीची काळजी पण घेईल आणि मला पण रात्रीचा आधार. आज काल सान्वी पण खूप धडपडी झालीय आणि तिच्या मागं धावताना माझं पैंटिंग्स करायचं पण राहून चाललंय. सान्वी ला पण तिची इंदू ताई खूप आवडते."
“असं झालं तर लई उपकार व्हतील बगा म्याडम. पोर हित ऱ्हाईली तर चार पैकं बी कमवंल आनि त्या हैवानापासनं बी वाचंल. उद्याच कापडं घेऊन धाडते आमच्या इंदीला हिकडं."
दुसऱ्या दिवसापासन इंदू बंगल्यातल्या गेस्ट रूम मध्ये राहू लागली. सान्वी आणि तिचं खूप छान जमायचं. सान्वीला आवरण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंत आणि खेळवण्यापासून ते झोपवण्यापर्यंत सगळं इंदू अगदी मनापासून करायची. आता शांभवीला पण रात्री एकटीला भीती वाटायची नाही.
प्रदर्शन संपून दोन अडीच महिने झाले असले तरी त्याची धुंद अजूनही शांभवीच्या मनात होती. प्रदर्शनाला आलेल्या जवळपास सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं होत. घर भर पसरलेले बुकेज आणि फोन, मेसेज यावरून शुभेच्छांचा वर्षाव तर महिनाभर सुरु होता. एका नामांकित वर्तमानपत्रात प्रदर्शनाचा तपशीलवार वृत्तांत पण छापलेला होता. त्यात शांभवीच्या पैंटिंग्सचं वर्णन आणि तिच्या कल्पकतेचं कौतुक केलं होतं. आणि या सगळ्याचा परिणाम असावा, पण शांभवीनं अजून जोमात काम सुरु केलं होतं. येत्या सहा महीन्यांत दुसरं प्रदर्शन भारवायचंच असा तिने स्वतःशीच निश्चय केला होता. त्यासाठीचेच लँडस्केप हुडकायला आणि त्याबरोबरच सुट्टी घालवायला ती सगळ्यांबरोबर गोव्याला आलेली होती. काहीही झालं तरी आजचा सूर्यास्त आपल्या रंगांमध्ये बंदिस्त करायचाच असा विचार करत ती रिक्लाईनर चेअवर पडली होती.
डोळे बंद करून लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज कानांत साठवत तल्लीन झालेली शांभवी मोबाईलच्या आवाजानं दचकली. थोड्या नाराजीनंच तिनं तो अनोळखी नंबर बघूनही फोन उचलला.
"डोळ्यात सागराला भरून,अथांग तुही असशील का
चंद्र तुझा होईन मी, तूजला भरती परी येईल का "
"कोण बोलतंय ?" शाम्भवीन अनिश्चितपणे विचारलं.
"अगं, एवढ्यात विसरलीस कि काय मला. दोन महिन्यांपूर्वी तर भेटलेलो आपण तुझ्या पैंटिंग्स च्या प्रदर्शनात. तुझ्या सुंदर पैंटिंग्स चा आणि त्याहूनही सुंदर असलेल्या तुझ्या सौन्दर्याचा एक चाहता, आणि कोण?" पलीकडून आवाज आला.
"अमित?" नकळत शांभवीच्या तोंडातून ते नाव बाहेर आलं आणि तेच नाव आपल्याला कसं काय आठवलं ह्याचा विचार करत असतानाच पलीकडून आवाज आला.
"आज तो मरने का भी कोई गम नही मोहोतरमा"
"काही काम होतं का अमित?" यावेळेस मात्र अगदी निगुतीनं गंभीर स्वरात तिनं विचारलं.
"खरं तर तुझा गोड आवाज ऐकायचा होता आणि त्यासोबत एक छोटंसं कारणही होतं. डिजिमॅक्स च्या बुकलेट वर एका ठराविक थिम असलेली पैंटिंग्स काढून हवी होती. अर्थातच हा रीतसर ऑफिशिअल प्रस्ताव आहे. पैश्यांबद्दल नंतर बोलणं होईलच पण त्याआधी तुझा होकार आहे का हे समजून घेण्यासाठी फोन केलेला होता."
"सॉरी अमित , पण मला नाही जमणार हे. प्रदर्शनापर्यंत ठीक होत पण हे सगळं... नाहीच जमणार मला. दुसरं म्हणजे अशी साचेबद्ध ठरवलेल्या थिम मध्येच, ठराविक फ्रेमची पैंटिंग्स मला बनवायला येत नाहीत. माझ्या रंगांमध्ये माझ्या भावनापण असतात आणि त्यामुळं तू सांगितल्याप्रमाणे एका बंदिस्त मर्यादित साच्यात मी काम नाही करू शकणार." अमित पुढं काही बोलायच्या आतच तीनं फोन ठवून दिला.
त्या रात्री शांभवीनं अथर्वला अमितनं फोनवर दिलेला प्रस्ताव आणि त्यावर तिनं त्याला दिलेलं उत्तर पण सांगितलं. हे सगळं ऐकून झाल्यावर अथर्व तिला म्हणाला,"
"आता खरं खरं सांग, का नकार दिलास ? सांगेल ते, सांगेल तसं , सांगेल तिथं कुठलंही चित्र तू काढू शकतेस, कल्पनांची भरारी घेऊन हवं ते कॅनवासवर उतरवायची कला तुझ्यात आहे हे मी तुझ्याइतकंच जाणतो. असं असतानाही काहीतरी फालतू कारण पुढं करून तू अमितच्या प्रस्तावाला नकार देतेस आणि हे सगळं ऐकून घ्यायला मी अमित नव्हे तर तुझा नवरा आहे."
"हे बघ अथर्व, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते पण खरं सांगायचं तर मला हा अमित एवढा काही पटला नाही. तो खूप विचित्र आहे, काहीही बडबड करतो आणि मला नाही पटत हे सगळं. म्हणूनच मला त्याच्याबरोबर काम नाही करायचं आहे. दुसरं म्हणजे ए बी एस ग्रुप सारख्या मोठ्या कंपनीच्या मालकाची बायको एका लहान आणि सो सो असलेल्या कंपनीसोबत काम करते हे थोडं वेगळं आणि विचित्र वाटत नाही का तुला?"
"अगं खूळूबाई, एवढा विचार कधीपासून करायला लागलीस? मी अमितला ओळखतो, तू म्हणालीस तसं खूप बडबड्या आहे तो, कधी कधी थोडं विचित्र वागतो-बोलतो पण. पण खरं सांगायचं तर खूप चांगला आहे तो मनानं. लग्न झालंय, एक मुलगा आहे त्याला आपल्या सान्वीच्याच वयाचा आणि खूप काळजी घेतो तो त्याची. एक प्रेमळ बाप आणि कर्तव्यदक्ष नवरा अशीच प्रतिमा आहे त्याची. सो बेबी, हि इज हार्मलेस. कुणा अनोळखी माणसाबरोबर कुठलंतरी प्रोजेक्ट करण्यापेक्षा अमितसारख्या मला माहित असलेल्या व्यक्तीबरोबर तुझं असणं हि माझ्यासाठी जमेचीच बाजू आहे. आणि आता तुझ्या दुसऱ्या शंकेबद्दल सांगायचं झालं तर जानू , मी असला कुठलाही विचार करत नाही. अमितच्या कंपनीचं स्टेटस काय आहे, त्याचा आपल्या कंपनीशी काय संबंध आहे, हे सगळं तू बाजूला ठेवावंस असं मलातरी वाटतं. तुला आज जे प्रोपोजल आलंय ते तू ए बी एस ग्रुपच्या मालकाची बायको आहेस म्हणून नव्हे तर एक यशस्वी आणि कुशल कलाकार आहेस म्हणून. त्यामुळं जास्त विचार न करता उद्याच त्याला फोन करून होकार कळव."
"हम्म, मी विचार करीन तुझ्या सल्ल्याचा." शांभवी पुटपुटली.
"आणि मॅडम, आपण इथं गोव्याला आलोय ते अमितचं पारायण करायला नव्हे. रात्री करायसाठी बर्याचश्या गोष्टी आहेत." असं म्हणत अथर्वंनं शांभवीला जवळ ओढलं.
रात्र चढणाऱ्या प्रत्येक श्वासांबरोबर धुंद होत गेली. संध्याकाळी काढलेलं सूर्यास्ताचं पैंटिंग भेसूर हसत होतं .

Friday, October 19, 2018

When the life ends...




One morning God said, this is your final day
Tonight I will come back to pick you far away
I stared with agony in eye, I skipped my beat
They said life is short but have I even lived it?
I ran behind dreams, I fought for the best
I never saw what I owned in the valley of quest
I carried along hatred, greed, anger and lust
I forgot the happiness in my ego to thrust
How can I mend it O God, in a small single day
I have lot to do but there is no time to pay
God smiled and said, that’s what the life is
It looks a big, but ends in a very minute
Life is not a journey of heart and breath
The only truth you born with is “the death”
Live every moment dear, as if it’s a last day
See how happy the life is in its own way

कुछ नगमे

 -1-

प्यार तो तुझे हम खुद से भी ज्यादा करते है
लेकिन पता है के इस रिश्ते की कोई अहमियत नही
क्यो इस ज़िन्दगी को दांव पे लगाने चले है फिर
जब की तेरे ज़िन्दगी में आने की मुझे इज़ाज़त नही...




-2-
वक्त बीतता गया लम्हे बितते गए
हम तुम्हारी याद में तनहा बितते गए

समंदर के पानी को किनारे मिल गए
पर हम अपनी प्यास के सहारे जीते गए

चाँद ने अपनी चांदनी से बातें भी कर ली
हम दो लब्ज़ बोलने के लिए खुद को बेचते गए

ऐ वक़्त हमे थोड़ा वक्त दे खुद से
हम सांसे ले रहे है, वो ज़िन्दगी बनते गए




-3-

जो कभी हमारे होने को अपनी तकदीर मानते थे... आज न जाने क्यों हमे अपना वक़्त देने को फुरसत ढूंढते हैं

बड़ी बेकदर है ये दुनिया मेरे दोस्त... रोशनी आने के बाद चिरागों को बुझाने को अपनी जिम्मेदारी मानते हैं।

Monday, October 15, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग 2


"शांभवी पुढच्या महिन्यात आपल्या नवीन ऑफिस आणि प्रोजेक्ट संदर्भात आपल्याला फ्रँकफर्ट  ला निघायचं आहे  तेव्हा इकडची सगळी कामं आटोपून घे आणि उरलेली कामं टीम ला विभागून दे." फोन वरून अथर्व शांभवीला सूचना देत होता. 
"ठीक आहे अथर्व. नेहमीप्रमाणे मी प्रेसेंटेशन पण तयार करते." असं म्हणून शांभवीने फोन खाली ठेवला आणि ती आपल्या कामाला  लागली. 
अथर्व जॉईन झाल्यापासून एका वर्षातच ए बी एस ग्रुप ने बरीच मोठी मजल मारली होती. भारतात जवळपास सगळ्या मोठ्या शहरांत तर ऑफिसेस उघडली होतीच पण ह्या पलीकडे भारताबाहेरही दोन देशांमध्ये ए बी एस ग्रुप ऑफ कंपननीच्या शाखा उघडल्या होत्या आणि ह्या सगळ्या प्रगतीबरोबरच शांभवी आणि अथर्वची मैत्री पण फुलत चाललेली होती. फक्त ऑफिसातच नव्हे तर ऑफिसबाहेरही भेटणे, लॉन्ग ड्राईव्हस ह्या सगळ्यामुळं कळत नकळत का होईना, पण अबोल असणाऱ्या शांभवीला एक जीवाभावाचा मित्र भेटला होता. अथर्व हा बाकी सगळ्या पुरुषांसारखा नाही हे पहिल्या दोन भेटींमध्ये कळल्यावर शांभवीने परत मैत्रीत हात कधीच आखडता घेतला नाही.
ठरल्या दिवशी शांभवी सकाळी एअरपोर्ट ला तीन तास आधी येऊन वेटिंग लाऊंज मध्ये अथर्वची वाट बघत बसली होती. सकाळी लवकर निघाल्याने तिचा डोळा लागला आणि जेव्हा तिला दचकून जाग आली तेव्हा  फ्रँकफर्ट फ्लाईटच्या बोर्डिंग ची घोषणा तिने ऐकली. आजूबाजूला बघितलं तर अथर्व कुठंच दिसत नव्हता, मोबाईलवर फोन केला तर तोही लागेना. कधी एक मिनिटाने पण उशीर न करणारा अथर्व आज आला नसल्यानं शांभवी ला आज पहिल्यांदाच त्याच्याबद्दल इतकी काळजी वाटत होती. काय करावं ह्या विचारात असतानाच दुरून गडबडीत येणारा अथर्व तिला दिसला.
 "अरे कुठं होतास इतका वेळ? फोन का लागत नव्हता? काय झालं नक्की? अरे किती काळजीत होते मी." डोळ्यात पाणी आणि रागाने लालबुंद झालेल्या शांभवीला बघून आज अथर्व ला खूप मजा वाटत होती.
"अगं फोन बंद पडला होता आणि ट्रॅफिक पण खूप होतं . पण तू किती प्रश्न विचारतेस गं. मला तर वाटायला लागलय तुझ्या प्रश्नमंजुषेमुळं आपली फ्लाईट मिस होतेय की काय." अथर्वने हसतच उत्तर दिले.
आज पहिल्यांदाच अथर्व शेजारी बसताना तिला अवघडल्यासारखं होत होतं. एकतर आज पर्यंत कधी कुणासाठी एवढी काळजी तिला वाटली नव्हती आणि दुसरं म्हणजे अथर्वशी एवढ्या बालिशपणे वागल्यामुळं तिला स्वतःचा राग पण येत होता. अथर्व मात्र डोळ्याच्या कोपऱ्यातून तीचे बदलणारे हावभाव बघून गालातल्या गालात हसत होता.
नेहमीप्रमाणेच मीटिंग यशस्वीपणे पार पडल्यावर दोघेही माईन नदीच्या काठी असलेल्या एका बार मध्ये ड्रिंक्स घेत बसलेले होते. ऑक्टोबर मध्ये जवळपास शून्याच्या आसपास असलेल्या तापामानात शहर खूप रम्य दिसत होते.
त्या धुंद वातावरणात अथर्वने शांभवीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, "शांभवी, आज जवळपास एक वर्ष आपण एकमेकांना ओळखतो आणि बघताबघता तू इतकी जवळची मैत्रीण झाली आहेस कि कधी कधी वाटतं कि माझं सगळं आयुष्य फक्त आणि फक्त तुझ्याभोवतीच फिरतंय. आडून बोलायची मला सवय नाही आणि म्हणूनच शांभवी, माझ्याशी लग्न करशील? अशी गोड, हुशार, सुंदर आणि माझी सगळ्यात प्रिय मैत्रीण मला आयुष्यभर जवळ हवी आहे माझी बायको म्हणून .मला खूप आवडतेस तू शांभवी. खरंच गं,  माझ्याशी लग्न करशील?"
त्या रात्री  फ्रँकफर्टच्या थंडगार नदीकिनाऱ्यावर आपल्या प्रेमाची मोहर आणि अबोल होकार अथर्वला कळवताना शांभवीच्या मनात हजारो फुलं आणि अंगावर हजारो रोमांच फुलले होते.
मुंबई ला परत आल्यावर मात्र गोष्टी तश्या खूप जलद होत गेल्या. दोघांच्याही घरच्यांना कल्पना देऊन, त्यांच्या संमतीने साखरपुडा आणि नंतर लग्न ते सगळं जवळपास चार महिन्यातच उरकलं.
'समर्थ' नावाच्या विशालकाय बंगल्यामध्ये दोघेही पुढल्याच वर्षी राहायला आले. अथर्व आता मॅनेजिंग डायरेक्टर तर शांभवी ने असिस्टंट डायरेक्टर ची जागा घेतली होती. दोन वर्षातच जवळजवळ पाच वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा आणि रोज वाढत जाणारा बिझीनेसचा डोलारा दोघेही अत्यंत मजबुतीने सांभाळत होते. तिसऱ्या वर्षी मात्र गोड बातमीची चाहूल लागताच शांभवीने रीतसर राजीनामा देऊन घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. अर्थातच ती घरातून हवी ती मदत करत होतीच आणि त्याचबरोबर फावल्या वेळेत तिने पैंटिंग्स करायला सुरुवात केली होती. एकूणच काय तर दोघेही एकमेकांच्या सोबत खूप खूप खुश होते आणि थोड्या महिन्यातच सान्वी च्या आगमनाने तर ते छोटंसं कुटुंब पूर्ण झालं.
आता शांभवीचा बराचसा वेळ सान्वी साठी खर्च होत होता, अथर्वपण नेहमी दौऱ्यावर असे. या मोकळ्या वेळेत   शांभवीने बरीच पैंटिंग्स काढली होती. दुसऱ्या मजल्यावरचा हॉल म्हणजे तिची आर्ट गॅलरीच बनली होती.
"तू तुझ्या पैंटिंग्स च प्रदर्शन भरवायला हवंस. आता सान्वी पण दोन वर्षाची झालीय आणि तुझी पैंटिंग्स पण खरंच खूप सुंदर आहेत... अगदी तुझ्यासारखीच" अथर्व तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला सारत म्हणाला.
"मी पैंटिंग्स फक्त स्वतःसाठी काढते, हातात ब्रश घेऊन कॅनव्हास वर मारलेला पहिला स्ट्रोक माझ्या मनातली सगळी मरगळ एका क्षणात दूर करतो. फक्त पैंटिंग्स नाहीत तर भावना आहेत त्या माझ्या. त्यांचं असं प्रदर्शन करणं मला नाही जमणार. कधी हे सगळं करावं असं मनातही आलं नाही रे माझ्या."
"अगं तू एकदा माझं ऐकून तर बघ. अंधाऱ्या खोलीत झाकून ठेवलेलं सौदर्य आणि मनात दाबून ठेवलेल्या भावना काय कामाच्या? सौदर्याला कौतुकाची जोड आणि भावनांची अभिव्यक्ती होणं जास्त महत्वाचं"
शेवटी हो-नाही  करत करत शांभवीने पैंटिंग्सचं प्रदर्शन भरवायला होकार दिला.
नेचर आर्ट गॅलरीचा भव्य हॉल आज गर्दीनं फुलला होता. अथर्वचे  बिझिनेस पार्टनर्स, कलिग्स, मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि बरेच ओळखीचे तसेच अनोळखी लोक आलेले होते.
"तुम्हाला समुद्र खूप आवडतो ना?" तिच्या कानापाशी आलेल्या  हलक्या पण स्पष्ट आवाजानं शांभवीनं अचानक मागं वळून पाहिलं.
"अरे अमित, वेलकम.  शांभवी, मीट अमित. वाईस प्रेसिडेंट ऑफ डिजिमॅक्स. अलीकडेच आपल्या कंपनीबरोबर ह्यांनी करार केलाय पुढच्या दोन वर्षांसाठी." अथर्व ने अमित ची ओळख करून दिली. 
" हाय शांभवी, खूप सुंदर आहेत तुमची पैंटिंग्स." अमितने हस्तांदोलन करत शांभवीचं कौतुक केलं.
"थॅंक्स अमित" मंदस्मित करत शांभवी बोलली.
थोड्या वेळानं अथर्व थोडा दूर कुणाशीतरी बिझिनेसबद्दल बोलत असलेला पाहून शांभवी बार काउंटर शेजारी बार स्टूल वर बसलेल्या अमितजवळ गेली .
" मला समुद्र आवडतो हे तुम्हाला कसं  काय कळलं ?"मनात मघापासून घोळत असलेला प्रश्न तिनं  शेवटी त्याला विचारलाच.
"तुमच्या प्रत्येक पैंटिंग मध्ये कुठं ना कुठंतरी समुद्राची छटा आहेच. कधी तरंग तर कधी निळा रंग, कधी खोली तर कधी त्याची विशालता. तुमच्या पैंटिंग्स बघून वाटतं कि माणसाच्या सगळ्या स्वभावांना, भावनांना तुम्ही समुद्राशीच जोडलेलं आहे. जेवढा वेळ हि पैंटिंग्स बघावीत, तेवढ्यांदा त्यांच्या प्रेमात पडावसं वाटतं. किती गूढ असता नाही तुम्ही कलाकार मंडळी. कुठल्याही दोन गोष्टींना कला नावाच्या दुव्यानं तुम्ही कसंही जोडू शकता." अमितनं हसत उत्तर दिलं.
"हम्म. खरंय. पण खरं सांगायचं तर संध्याकाळपासनं इतके जण येऊन गेले पण तुम्ही मात्र अचूक ओळखलंत. तुम्ही पण पैंटिंग्स करता की काय?"
"हाहाहा... मी आणि पैंटिंग्स? नुसता ठोकळा आहे मी कलेच्या बाबतीत. मला फक्त बिझिनेस करायला येतो आणि अर्थातच तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांशी मैत्री करायला येते. आता राहिला प्रश्न माझ्या अचूक अंदाजाचा; तर शांभवी, त्यासाठी मला तुझी पैंटिंग्स बघायची  गरज नाही कारण तुझ्या डोळ्यात संपुर्ण सागर सामावला आहे आणि त्यातच मला सगळे रंग सापडतायंत. ते रंग तुझ्या मनाचा ठाव सांगत आहेत, तुझ्या सौदर्याची पाखरण करत आहेत, तुझ्या हास्यानं गडद होत आहेत तर तुझ्या उदासीनतेन फिके पडत आहेत, तुझ्या अस्तित्वातच चकाकत आहेत आणि तुझ्या नसण्यानं निष्प्रभ वाटत आहेत."
शांभवी काहीच बोलली नाही पण कुठंतरी ओठांच्या कोपऱ्यात उलगडलेलं हसू अमितनं नक्की बघितलं.


क्रमशः 
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)





Friday, October 12, 2018

क्राईम डायरीज : एक शापित नातं : भाग १

सकाळी सात वाजले तरी आपल्या अतिभव्य बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून शांभवी विचार करत होती. समोर उधळणाऱ्या लाटा आज तिचं  मन हलकं करत नव्हत्या. अथर्व च्या मागं लागून तिनं हा सी फेस बंगला विकत घेतला होता. शहराबाहेर दूर आणि समुद्र किनारी असलेल्या ह्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर तिची आणि अथर्व ची शानदार बेडरूम होती. सोबतच साथ देणारा घोंघावता खारा वारा आणि लाटांचा उमदा आवाज तिला खूप आवडायचा. बेडरूमच्या टेरेस वर उभी राहून ती तासंतास समुद्राकडे बघत राही पण आज मात्र तिला तो आवाज भेसूर वाटत होता. ह्या समुद्राने आपल्याला त्याच्यात सामावून घ्यावे आणि या जगासाठी आपण एका क्षणात नाहीसे व्हावे असे तिला वाटत होते. काल रात्रीच्या प्रसंगानंतर रात्रभर तिला झोप लागली नव्हती. शेजारी झोपलेल्या अथर्व कडे  बघून तिच्या डोळ्यात पाणी आणि मनात अपराधी भावना येत होती. पहाटे लवकर उठून एक कडक कॉफी घेतल्यावर तरी बरं वाटेल असं वाटून पहाटेच ती टेरेस वर उभी होती. रात्रभर झोप न झाल्याने आणि खूप जास्त विचार केल्याने तिला थकवा वाटत होता. पण आज काही झालं तरी हा अध्याय संपवायचा तिनं निर्णय घेतला होता. सकाळी नऊ वाजता अमितने काल  सांगितलेल्या ठिकाणी भेटायचं वचन तिनं त्याला दिल होतं पण त्याला भेटण्याचा दरवेळ सारखा उत्साह मात्र आज राहिला नव्हता.
अमित.. तरुण, देखणा, राजबिंडा, एका मोठ्या कंपनीचा वाईस प्रेसिडेंट आणि तिच्या दुसऱ्या पण समांतर आयुष्याचा एकमेव साक्षीदार. अमित चा विचार आल्यावर आपसूक त्याच्या बरोबर घालवलेल्या धुंद क्षणांना आठवून तिच्या ओठावर मंद हसू आलं पण दुसऱ्याच क्षणी त्याची जागा परत खोल विचारांनी घेतली. खोल विचार.. अगदी समोर अंथरलेल्या सागरासारखे गूढ पण तरीही अथांग. 
                                                                                  -----

 शांभवी परांजपे म्हणजे सौदर्याची जिवंत व्याख्याच जणू. सोनचाफ्यासारखा रंग, सोनकळीसारखं नाक, खांद्यावर रुळणारे कुरळे केस आणि गुलाबी ओठांवर असणारं फुलं उधळणारं हसू. कुणीही मागं वळून पाहावं असं आरस्पानी सौदर्य म्हणजे शांभवी. एका नामांकित युनिव्हर्सिटी मधून एम बी ए झाल्यावर ए बी एस ग्रुप नावाच्या एका मोठ्या कंपनी मध्ये ती मार्केटिंग डिपार्टमेंटला रुजू झाली. मुळातच हुशार आणि स्मार्ट असल्यामुळं अगदी कमी वेळातच शांभवी कंपनीचा केंद्रबिंदू बनली. शांभवी तशी मितभाषी, कुणाच्यात जास्त न मिसळणारी, आपण आणि आपलं काम ह्यातच लक्ष घालणारी पण तरीही कुणी काही मदत मागितली तर मात्र जीव तोडून मदत करणारी असल्यामुळं ती पुरुष कलीग्स मध्ये कौतुकाचा तर स्त्री कलीग्स मध्ये गॉसिप चा विषय ठरत होती. हे आपलं आगळं वेगळं वलय सांभाळत शांभवी मात्र प्रत्येक नवा दिवस स्वतःला सिद्ध करत पुढं जात होती. अर्थातच फक्त तीन वर्षांच्या कमी वेळात ती मार्केटिंग डिपार्टमेंट ची हेड बनली होती. 

"गुड मॉर्निंग ऑल, मी अथर्व सरपोतदार, ए बी एस ग्रुप ऑफ कंपनीचा नवीन सी इ ओ. नुकताच लंडन मधून एम एस करून परत भारतात आलोय आणि आज  ए बी एस ग्रुप ला जॉईन करतोय.  ए बी एस ग्रुप म्हणजे बाबांचं ध्येय आणि स्वप्नच नाही तर त्यांचं आयुष्य होतं. आणि आता ह्या स्वप्नांच्या पंखांनी आणखी उंच भरारी घ्यावी आणि येत्या पाच वर्षांत ए बी एस ग्रुपचं नाव फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही नावाजलं जावं हा माझा ध्यास आहे. तुम्ही सगळे जण ह्या कंपनीचे आधारस्तंभ आहात, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार आहात आणि म्हणूनच मला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या  सगळ्यांची अतिशय गरज आहे. आज पासून आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपल्या कंपनीचं नाव साता समुद्रापार न्यावं अशी माझी इच्छा आहे. सो गाईज , लेट्स मेक धिस ड्रीम कम ट्रू ." 
सगळ्यांचा इंट्रो झाल्यावर मीटिंग संपली पण अथर्वच्या तडफदार व्यक्तिमत्वाची छाप आणि मधाळ शब्दांच्या जादू मुळे सगळेच जण जीव टाकून कामाला  लागले. पुढचे सहा महिने कुणालाही कामाशिवाय काहीच सुचलं नाही. रात्री ११ वाजेपर्यंत मिटींग्स चालायच्या, नवनवीन अढाखे बांधले जायचे, चर्चा व्हायच्या, ए बी एस ग्रुपच्या विस्तारासाठी सगळ्यांचे अनुभव, वेळ आणि मेहेनत कामाला  लागली होती आणि बघता बघता सहा महिन्यांनंतर संपूर्ण प्रोजेक्टचा आराखडा पूर्ण झाला. कुणी काय, कसे आणि कधी करायचे ह्याचा तपशीलवार अहवाल बनवला गेला. आता फक्त ह्या बनवलेल्या योजने प्रमाणे काम करायचं बाकी होतं. शेवटच्या मीटिंग मध्ये अथर्वने सगळ्यांचे तोंड  भरून कौतुक केले आणि त्याच्या फार्म हाऊसमध्ये सगळ्यांसाठी एक पार्टी प्लॅन केली. 

काळ्या रंगाच्या शिमर बॅकलेस गाउन मध्ये  शांभवी अतिशय सुंदर दिसत होती. पार्टी हॉल मध्ये आल्यापासून सगळ्यांच्या नजरा  तिच्याकडेच होत्या, सगळीकडं तिच्याबद्दलच कुजबुज चालली होती आणि म्हणूनच कुणाशीही जास्त न बोलता फक्त हसून सगळ्यांना शुभेच्छा देत ती हॉल च्या सगळ्यात कोपऱ्यात जाऊन बसली. 
"एक वर्जिनो मोजितो प्लीज " तिने शेजारून जाणाऱ्या वेटर ला ऑर्डर दिली. 
हातातल्या कॉकटेल आणि भोवतालच्या संगीताचा आस्वाद घेत ती स्वतःमध्येच मग्न असताना मागून एक आवाज आला  "हॅलो मिस शांभवी, मी येथे बसू शकतो का?" 
"ओह्ह! अथर्व सर" तीन हातानंच समोर बसायला सांगितलं. 
अथर्वने आपल्या काळ्या ब्लेझरचे शेवटचे बटन सैल केले आणि हातातल्या व्हिस्कीचा सिप घेत तो शांभवी च्या समोर असलेल्या खुर्ची वर बसला. 
"तुम्ही अश्या एकट्याच इथं सगळ्यांपासून दूर येऊन बसला आहात, सगळं ठीक आहे ना?" आपल्या भरदार पण काळजीच्या सूरात अथर्वने शांभवीला विचारले. 
"असं काही नाही सर, खरं तर मला सगळ्यांच्यात मिसळायला जास्त आवडत नाही. ऑफिस मध्ये कामाच्या वेळेत एक टीम म्हणून काम करणं  वेगळं पण ऑफिस बाहेर असं सोशल व्हायला जमत नाही"
"पण का?" अथर्व चा परत एक प्रश्न. 
"असं काही खास कारण नाही पण चार लोकांच्यात मिसळलं कि नको त्या चर्चा, गप्पा ह्यात उगाचच मन भरकटतं आणि मग आपण कधी त्या सगळ्याचा एक हिस्सा होऊन जातो ते आपलं आपल्यालाच कळत नाही. दुसरं म्हणजे मला एकांत आवडतो, मी स्वतःबरोबर राहणं जास्त पसंत करते. मग कधी वेळ मिळाला की पैंटिंग्स काढते तर कधी कविता करते"
"होल्ड ऑन ... आय मीन तुम्ही कविता करता? पैंटिंग्स बनवता ? माझा तर विश्वासच बसत नाहीये. मला तर वाटलेलं कि तुम्ही फक्त आणि फक्त कामच करू शकता " अथर्व डोळे मिचकावत हसून बोलला. 
"म्हणजे मी काय इतकी बोरिंग काकूबाई वाटले कि काय तुम्हाला?" शांभवी तशी रागातच बोलली. 
"तुम्ही? आणि काकुबाई? हाहाहा.. अहो तुम्हाला काकूबाई म्हणून मला काय पाप लावून घ्यायचं आहे का? तुम्हाला काकू बाई म्हटल्याबद्दल देव मला नरकात पण जागा देणार नाही. पण हो. मघापासून अहो जाहो ऐकून  मला मात्र आजोबा असल्यासारखं वाटतंय. सो प्लीज कॉल मी अथर्व"
"उम्म, ठीक आहे पण एका अटीवर. तुम्ही पण मला अहो जाहो म्हणून काकूबाई बनवू नका." शांभवीने हसून उत्तर दिले. 
"चलो डील देन,शांभवी"
"हो अथर्व"
"इस मौके पे एक चीअर्स तो बनता है... चीअर्स!!!"
ग्लास किणकिणले आणि एक नव्या अध्यायाची सुरवात झाली होती. 

क्रमशः